विशेष व प्रसाद*
श्री गोविंदप्रभूंच्या निधनानंतर शके १२१० मध्ये आचार्य गंगातीराला आले, मग त्यांनी स्वामींची संबंधित स्थाने नमस करण्याचा क्रम धरला , क्रमवशे डोमेग्रामला आल्यावर त्यांना असे उमगले की , स्वामींनी आपणास ओटे गोटे नमस करावयास सांगितले आहे , तर आपण येथील पाषाण काढावेत , आपल्या प्रमाणेच सर्व मार्गास त्याचा उपयोग होईल, म्हणून त्यांनी डोमेग्रामच्या बाहेर पूर्वेकडे असलेल्या छिन्नस्थळीच्या स्थानातील पाषाणाचे तुकडे काढले,
डोमेग्रामातील राजमढ (नृसिंहमढ) पूर्णत: काष्टाचा होता , त्या मढाच्या उंबरठ्याचे विशेष करण्यासाठी आचार्यांनी सुताराकडून उंबरठ्याचे तुकडे करून घेतले, स्वामी ज्या ठिकाणी पाय ठेवित होते त्याचे थोरले पात्र (लाकडाची वाटी) केले व उंबरवटाच्या दोन्ही टोकाचे दोन लहान लहान पात्र तयार करून घेतले, उरलेल्या लाकडाचे मणी तयार करवून ते सर्व शिष्यांना नमस करण्यासाठी दिले , मोठे पात्र स्वत:जवळ नमस करण्यास ठेवले , त्यात प्रसादाचा फूटा, वाकी, साखळे, कांबी , दोन्ही जाडीचे विशेष, श्री गोविंदप्रभूंची प्रसाद वस्त्रे, कापुराची सेंद इत्यादी संबंधित वस्तू ठेवून ते नमस करीत असत, यास महानुभावांनी विशेष अशी संज्ञा दिलेली आहे .
संबंधित वस्तू नमस करण्यात यावी म्हणून काष्ट व पाषाणाचे 'विशेष' काढले, परंतु स्वामींची संबंधित वस्त्रे आचार्याजवळ नव्हती, त्याकरिता आचार्य निंब्याहून इंद्रभटाच्या गावी (सुरेगावास) गेले , तेथे त्यांनी इंद्रभटांची भेट घेतली व इंद्रभटास स्वामींनी प्रसन्न होऊन फुटा (अंगावरील उपरणे) दिला होता , तो त्यांना मागितला , इंद्रभटाने संतुष्ट होऊन अर्धा फुटा आचार्यांना दिला व अर्धा आपण नमस करण्यासाठी ठेवून घेतला,
हे कार्य पूर्ण झाल्यानंतर आचार्य परत निंबा येथे आले, त्यानंतर स्वामींच्या अंगावरील वस्त्रे ज्यांच्या जवळ होती ती त्यांच्याकडून आणली , अर्थातच ही वस्त्रे प्रसन्नतेने भक्तीजनास स्वामींनी दिलेलीच होती , या वस्त्रांना आचार्यादी गुरुकुल नमस करीत असे, इंद्रभटाजवळ राहिलेला वस्त्राचा अर्धा भाग तोही पुढे कालांतराने परमार्गाकडे आला , या वस्त्रास प्रसाद असे म्हणतात ,
प्रसाद म्हणजे प्रसन्नता प्रसन्न होऊन वस्तू देणे तो प्रसाद, स्वामींनी इंद्रभटाना प्रसन्न होऊन फुटा (उपरणे) दिला, आणि इंद्रभटानेही आचार्यास प्रसन्न होऊन दिला , आणखी काही जणाकडे स्वामींची वस्त्रे होती ती त्यांनी आचार्यांना प्रसन्न मनाने दिली , म्हणून या वस्त्रांना प्रसाद असे म्हटले आहे .
'विशेष' म्हणजे परमेश्वर अवताराचा ज्या वस्तुला स्पर्श झाला त्यास पावित्र्य येते , इतर वस्तू पेक्षा परमेश्वर संबंधित वस्तू मध्ये विशेषता असते , इतर पाषाणमय प्रतिमेची पूजा केल्यास त्यात देवतांचे सामर्थ्ये असते , परंतु काही दिवस पूजा बंद राहिली तर त्यात असलेले सामर्थ्ये निघून जाते, मग ती पाषाण मूर्ती सामर्थ्येहीन होते , तसे परमेश्वर चरणांकित पाषाणाचे नसते , शेकडो वर्षे त्याची (परमेश्वर संबंधित वस्तूची ) पूजा केली नाही तरी त्याची पवित्रता व त्यात असलेल्या शक्ती कधीच नष्ट होत नाहीत , म्हणून काष्टपाषाणादी वस्तूंना 'विशेष' म्हटले आहे,
या विशेषांचे दोन प्रकार आहेत , एक आज्ञारुप विशेष, दुसरा प्रसन्नरूप विशेष म्हणजे छिन्नस्थळीचा पाषाण श्री गोविंदप्रभूंनी साधाइसाला दाढ नख , केशकलाप , फोड , ताट , हे पांच पदार्थ दिले , हे प्रसन्नरूप विशेष होत , या विशेष व प्रसादाचाी माहिती श्री, व, स, तोंडोळीकरांनी लिहिलेल्या "दैनिक उपासना" या पुस्तकात दिली आहे , ती वाचकांनी वाचल्यास अधिक कळून येईल .

1 टिप्पण्या
Vishesh aani prasad che khup sunder mahiti samajle, Dandwat pranam
उत्तर द्याहटवा